Monday 29 August 2011

सावधान

आजच्या विज्ञान युगातसुद्धा मुलीच्या जन्मापासूनच "मुलगी झाली हो" असा टाहो फोडला जात आहे. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार या कारणास्तव तिचे बाल्यावस्थेतच शिक्षण खुंटले जात आहे. परक्याचे धन या सबबीखाली लहान वयातच तिला विवाह बंधनात जखडले जात आहे.
आपल्या देशात बालविवाहाची क्रूर समस्या आपली पाळेमुळे घट्ट रोवून बसली आहेत. बालविवाह कायद्याने गुन्हा ठरवूनसुध्दा सामाजिक रुढीच्या नावाखाली आजही असंख्य बालविवाह होत आहेत.
मुलीचा विवाह झाल्यावर डोक्यावरचे ओझे उतरल्यासारखे समाधान मानणारे आईबाप मुलीच्या  पुढील आयुष्याकडे चक्क डोळेझाक करीत असतात.या डोळेझाकीमुळे  पुढे मुलीवर ओढवणाऱ्या दु:खाने रडण्याची पाळी या आईबापांवर येते.
मुलीचे अवयव सक्षम झालेले नसल्यामुळे वैवाहिक जीवनाचा तीला जाचक त्रास सहन करावा लागतो. आई वडिलांच्या अंगणात खेळणाऱ्या अजाण बालिकेला संसाराच्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. आईच्या पदराखाली लपणाऱ्या निरागस बालिकेला लहान वयातच आई व्हावे लागल्यामुळे तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे होणाऱ्या अपत्यावरसुद्धा वाईट परिणाम होतात.
आपली मुलगी सुखी पाहण्यासाठी आई वडिलांनी या खुळ्या समजुती झटकून टाकल्या पाहिजेत. विज्ञानयुगातील जगात जगण्यासाठी मुलीला चांगली शिकविली पाहिजे आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावरच तिचे लग्न केले पाहिजे. तेव्हाच नातवंडे खेळविण्याचे खरे सुख आई वडिलांना मिळू शकेल.

No comments:

Post a Comment