Monday 29 August 2011

श्रद्धा

श्रद्धेमुळे माणूस पापभिरू बनतो. परमेश्वर आपल्याला दिसत नाही तरी ती एक अदृश्य शक्ती आहे असे मानणे ही एक श्रद्धा आहे. आपल्याकडून पाप घडले तर त्याचे भोग   आपल्याला भोगावे लागतील, या श्रद्धेमुळे मनुष्य पापापासून दूर राहतो. ईश्वर चिंतनाच्या श्रद्धेमुळे माणसाला आत्मशांती मिळते.पुंण्याच्या कल्पनेमुळे माणूस समाजसेवेचे व्रत स्वीकारतो. दुसऱ्यांच्या  उपयोगी पडतो. ईश्वर आहे या एकाच श्रद्धेमुळे मनुष्याला आणि समाजाला असे अनेक फायदे होतात.
जर मनुष्याने ही श्रद्धाच धुडकावून लावली तर अराजक माजेल.परमेश्वराचे अस्तित्व आणि पुंण्याची कल्पनाच नाकारली, तर मनुष्य स्वैराचारी होईल. माणसाला कशाचेच भय राहणार नसल्यामुळे तो मनाला येईल तसे दुर्वर्तनी कृत्य करीत राहील. म्हणूनच माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी श्रद्धेची अत्यंत आवश्यकता आहे.
परंतु अनेकांनी या श्रद्धेचे अंधश्रद्धेत परिवर्तन केले आहे. त्यामुळे अनेक अघोरी सैतानी कृत्ये घडत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. कोणी गुप्त धन मिळावे यासाठी मानवी बळी देतो, तर काहीजण स्वत:ला मुल व्हावे यासाठी दुसऱ्यांच्या बाळाला पळवून बळी देतात.सैतानाला लाजविणारे हे कृत्य पाहून आजच्या विज्ञान युगात माणूस अजूनही मागासलेला राहिल्याचे दिसून येते.
श्रद्धा माणसाला माणूस बनविते, तर अंधश्रद्धा माणसाला सैतान बनविते. श्रद्धेमुळे मन प्रसन्न व पवित्र बनते, तर अंधश्रद्धेमुळे अभद्र बनते. श्रद्धेमुळे सत्कृत्य घडतात, तर अंधश्रद्धेमुळे दुष्कृत्ये घडतात.
यासाठी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असावी परंतु  अंधश्रद्धा नसावी.