गावाकडे जमीन नाही. असली तरी पिकत नाही. घरात अठरा विश्व दारिद्र्य. बापाला मजुरी नाही. त्यामुळे खायला अन्न नाही. घरातल्या चुलीवर काय शिजवू या विचारात रडत बसलेली आई. भुकेने कासावीस झालेली लहान भावंडे. हे सारे पाहून वयात आलेला तरुण तळमळतो. लहानपणापासून प्रेम केलेले गाव सोडून नोकरी करण्यासाठी शहरात येतो.
शहरात आधीच बेकारांची संख्या जास्त. त्यात या तरुणाची भर. नोकरी नाही, आता गावाला परत कसे जाणार? कारण तिकिटाला पैसे नाही. तसेच शहरात सुद्धा जगणार कसे? कारण खायला पैसे नाहीत.
नाईलाजाने दुबळा असतो तो भिक मागतो. धडधाकट असतो तो हमाली करतो. शिकलेला तरुण मटक्याच्या अड्ड्यावर चिठ्या लिहितो आणि बंडखोर विचाराचा गुन्हेगारी टोळीकडे जातो.
गुन्हेगारी टोळीकडे गेलेला हा तरुण जे मागून मिळत नाही ते जबरदस्तीने मिळवतो. पण त्यात तो एवढा गुंतून जातो की, प्रतिस्पर्धी टोळीकडून मारला जातो किंवा पोलिसांच्या एनकाउंटरमध्ये बळी पडतो.
बापाचा मोडलेला संसार सावरण्यासाठी मोठ्या उमेदीने शहरात आलेल्या या तरुणाचे प्रेत गावाकडे परत जाते.
हे कालचक्र सतत फिरतच आहे. हे कालचक्र रोखण्यासाठी सामाजिक संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. बेकारीवर आत्महत्या किंवा गुन्हेगारी हे उपाय नाहीत, हे या तरुणांना समजावून सांगितले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी एकही व्यक्ती नोकरीला नाही, त्या घरातील एका तरी व्यक्तीला सरकारने नोकरी दिली पाहिजे. जर नोकरी उपलब्ध नसेल तर त्याला रस्त्याच्या कडेला टपरी बांधून छोटा रोजगार करण्याची परवानगी दिली पाहिजे. या विषयाची मागणी सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येवून केली पाहिजे.
really nice...
ReplyDeleteकाका खूप छान आहे हि गोष्ट अजून नवीन नवीन टाका... आम्हाला वाचायला खूप आवडेल...तुमच्या गोष्टी...
ReplyDeleteGood One :)
ReplyDelete