Saturday 27 August 2011

गणेशोत्सव

सर्व देवांमध्ये गणपतीला मोठा मान आहे.कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश पूजेने होते. गणपती ज्ञानाचा, विद्देचा  आणि बुद्धीचा दैवत आहे. गणपतीच्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा पौराणिक ग्रंथात सापडतील.
महाभारत ग्रंथाच्या निर्मितीसाठी गुरु व्यासांनी गणपतीला प्रसन्न करून महाभारत लिहून घेतले असा उल्लेख आहे. याठिकाणीसुध्दा गणपतीच्या ज्ञानाचे आणि विद्वत्तेचे विविध पैलू दिसून येतात.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाच्या विचार प्रसाराला एक मोठे व्यासपीठ मिळाले. 
गणेशोत्सवाच्या काळात व्याख्याने, चर्चा, बैठका या माध्यमातून समाज जागृतीचे मोठे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळात घडले. पण स्वातंत्र्योत्तर काळात पुढे पुढे मात्र गणेशोत्सव हे समाज जागृतीचे उत्सव आहे याचा विसर पडू लागला. त्यामुळे समाज मनावर राष्ट्रभक्ती बिंबविणारी समरगीते,पराक्रमाचे पोवाडे ,भावगीते, भक्तिगीते दूर झाली आणि त्यांची जागा पाश्चात्य डिस्को संगीताने घेतली. गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा सुरु झाली. समाज प्रबोधन करणाऱ्या गणेशोत्सवात समाज विघातक गुटख्यांच्या जाहिराती दिसू लागल्या.
गणेशोत्सव समन्वय समिती स्थापन झाल्यापासून हे चित्र बदलत चालले आहे. आता पुन्हा एकदा गणेशोत्सव सामाजिक चळवळीचे केंद्र बनू पाहत आहे. या गोष्टीची आज अत्यंत गरज आहे. बालविवाह,लोकसंख्यावाढ,पर्यावरण,राष्ट्रीय एकात्मता,परकीय आक्रमण,नशाबंदी,भारतीय संस्कृतीचे संरक्षण,भृणहत्या,महागाई,भ्रष्टाचार,महिलावरील अत्याचार,हुंडाबळी अशा कितीतरी विषयावर गणेशोत्सव मंडळ जनजागृती करू शकतात.
स्वातंत्रपूर्व काळात स्वराज्य मिळविण्यासाठी कारणीभूत ठरलेला गणेशोत्सव,स्वातंत्र्योत्तर काळात सुराज्य निर्माण करण्यास उपयोगी पडावा अशी गणराया जवळ आपण सर्वांनी प्रार्थना करूया !
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ||

No comments:

Post a Comment