Sunday 14 August 2011

भ्रष्टाचारी व्यवस्थापन

जसे एखाद्या शहरात प्रवेश करण्यासाठी टोल द्यावा लागतो, तसे आपल्या देशात जन्म घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पहिले पैसे भरून फॉर्म विकत घ्यावा लागतो. मग प्रत्येकजण यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतो. कोणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जन्म घेतो, तर कोणी पालिकेच्या किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जन्म घेतो. पण जन्माला येण्यासाठी फॉर्मच्या रूपाने का होईना पण पैसे द्यावेच लागतात.
आईच्या प्रेमळ सावलीच्या पदरातून दुडू दुडू बाहेर फिरायला लागल्यावर जीवघेण्या शैक्षणिक पद्धतीमुळे बोबड्या बोलातच विद्यामंदिरात दाखल होण्यासाठी बाळाच्या वजनापेक्षाही अधिक वजनाच्या रुपयांचे डोनेशन कंपल्सरी द्यावे लागते. शाळेमध्ये  प्रचंड संख्येने विद्यार्थी असल्यामुळे अभ्यास समजण्यासाठी भरमसाठ फी असलेल्या क्लासच्या आश्रयाला जावे लागते.
दहावीची सीमा ओलांडून पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रचंड रांगा लावाव्या लागतात. तेथेही मोठमोठे वशिले लावावे लागतात. कॉलेजमध्ये शिकत असतानाच अठरा वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे स्वतंत्र भारताचे मताचे स्वातंत्र्य मिळतात. घटनेप्रमाणे आपले मत मांडण्याचे अधिकार प्राप्त होतात.पण ते फक्त कागदावर ! कॉलेजमध्ये आपले मत मांडायला स्वातंत्र्य नाही. एखाद्याने मत मांडलेच, तर तो उद्धट ठरतो. एटी केटी ची धमकी देत संधीसाधू प्राध्यापक विद्यार्थ्यांचा छळ करतात.
पदवी मिळाल्याचा आनंद होतो. पण नोकरीसाठी वणवण भटकावे लागते. तेव्हा लक्षात येते की,या कागदी पदवीला किंमत नाही. मग एखाद्या ठिकाणी लाच देवून नोकरी मिळवावी लागते. पुन्हा स्वतंत्र संसारासाठी जागेचा शोध घ्या ! स्वस्त घरासाठी फॉर्म भरा ! मग लौटरीची वाट बघा ! तेथेही नैराश्य ! शेवटी बिल्डर सांगेल त्या किंमतीत घरे घ्या. त्यासाठी प्रचंड व्याजाची कर्जे घ्या. घरात उपाशी राहिलो तरी चालेल, पण जप्ती होवू नये म्हणून घराच्या कर्जाचे हप्ते पहिले भरा.
जन्मापासून जगण्यापर्यंत या भ्रष्टाचारी व्यवस्थेने माणुसकीच्या छाताडावर पैशाला वैभव प्राप्त करून दिले आहे. स्वार्थाचे संस्कार नकळत समाजव्यवस्थेकडून दिले जात आहे. आपल्या पिढीने हे सोसले. पुढच्या पिढीला भ्रष्टाचारविरहीत जीवन जगण्यासाठी आजचे हे भ्रष्टाचारी व्यवस्थापन नष्ट करून टाकूया.              

No comments:

Post a Comment